सिंदी (रेल्वे) -/ शहरातील मुख्य महामार्गावरील दोन्ही बाजूच्या सांडपाण्याच्या नाल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मागील अंदाजे 20 वर्षांपासून या नाल्यांचे बांधकाम झाले नसल्याने आजघडीला पूर्णतः नेस्तनाबूत झाली आहे. जीर्ण झालेल्या नाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांच्या घरात सुद्धा दुर्गंधीयुक्त पाणी मुरत आहे. परिणामी, या दोन्ही बाजूच्या नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी माजी नगरसेवक अकिल शेख यांनी मुख्याधिकारी न.प. सिंदी तसेच आमदार कुणावार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
सेलडोह-सिंदी-कांढळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361असून या महामार्गाच्या रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून केदारेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांना दिले आहे. या सिमेंट रस्त्याचे बांधकाम 90 टक्के झाले असून शहरातील मटनमार्केट ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत डांबरीकरण झाले आहे. मात्र, शहरातील या दोन्ही बाजूंच्या नाल्याचे बांधकाम केदारेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असतांना सुद्धा त्यांनी अद्यापही नाल्यांचे नवीन बांधकाम केले नाही. शहरातील या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूंची नाली ही मागील 20 वर्षांपासून जीर्ण झाली असून आजघडीला संपूर्ण नेस्तनाबूत झाली आहे. स्व. उत्तम पेटकर ते गुड्डू महाजन यांच्या घरापर्यंतची नाली पूर्ण खचली असल्याने नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी मुरत आहे.
शहरातील या महामार्गावरील पेटकर ते महाजन यांच्या घरापर्यंतचा रस्ता अरुंद असून या ठिकाणची नाली संपूर्ण खचली असून येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महामार्गावर जड वाहनांसह छोट्यामोठ्या वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. त्यामुळे शहरातील पेटकर ते महाजन यांच्या घरापर्यंतहा हा अरुंद रस्ता त्यातच खचलेल्या नालीमुळे याठिकाणी अपघातांची संख्या वाढली आहे. परिणामी, याठिकाणी एखाद्या वेळेस मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बसस्थानक ते मटनमार्केट पर्यंतयच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी प्रभाग 8 मधील माजी नगरसेवक अकिल शेख यांनी न.प. मुख्याधिकारी सिंदी तसेच आमदार कुणावार यांना निवेदनातून केली आहे. यावेळी शंकर काटोले, पुंजराम किरनाके, लक्ष्मण गेडाम, गजानन पोईनकर, दीपक गाते, शिवा सराटे, राजकुमार शिरभए, दिलीप कावळे आदींची उपस्थिती होती.