वर्धा -/राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने वर्धा जिल्ह्यातील एका गंभीर प्रकरणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. श्रीमती सुषमा अरुण वानखेडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत, आयोगाने वर्धा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कडक भाषेत निर्देश दिले आहेत. डॉ. सुषमा वानखेडे यांनी महिला आयोगाकडे संरक्षणासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी धाव घेतली होती. हे प्रकरण अत्यंत ‘गंभीर’ स्वरूपाचे असल्याचे आयोगाने नमूद केले असून, पीडितेची सुरक्षितता तात्काळ सुनिश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत आयोगाने कठोर सूचना केल्या आहेत
तक्रारदाराला पोलीस कार्यालयात प्रत्यक्ष बोलावून त्यांचे म्हणणे सविस्तर जाणून घ्यावे.
या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, याची स्पष्ट तंबी पोलिसांनी देण्यात आली आहे. तक्रारीच्या आधारावर तात्काळ कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करावी. केलेल्या संपूर्ण कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महिला आयोगाला तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाच्या समुपदेशक तथा प्रकल्प अधिकारी सकीना शरिफ यांच्या स्वाक्षरीने हे पत्र धाडण्यात आले आहे. या पत्राची प्रत सावंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता वर्धा पोलीस काय पाऊल उचलतात आणि दोषींवर कधी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
”महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी त्वरित ॲक्शन घेणे अनिवार्य आहे.” – आयोगाचा स्पष्ट संदेश.