🔥वामन यंगड मृत्यू प्रकरण: अखेर १० दिवसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल;आरोपींना अटक.
बुलढाणा -/ तालुक्यातील माळवंडी येथील वामन यंगड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. घटनेच्या दहा दिवसांनंतर, प्रशासकीय दिरंगाईवर टीकेची झोड उठल्यानंतर, रायपूर पोलिसांनी अखेर संबंधित आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
१९ मार्च रोजी गावातील संदीप कड, चव्हाण आणि विजय नाटेकर हे वामन यंगड यांना त्यांच्या घरून सोबत घेऊन गेले होते. मात्र, काही वेळाने त्यांना मृत अवस्थेतच घरी आणून सोडण्यात आले. वामन यंगड यांच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. विशेषतः डोक्यावर गंभीर वार करण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत होते. मृताचे कपडे बदलण्यात आल्याचेही समोर आल्याने हा निव्वळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.
🔥प्रशासकीय दिरंगाई आणि जनक्षोभ.
घटनेनंतर आठवडा उलटूनही पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने परिसरात संतापाची लाट होती. पोलिसांकडून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. या अन्यायाविरोधात ॲड. गुणवंत नाटेकर आणि राष्ट्रीय स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरडकर यांनी आक्रमक पवित्रा घेत १४ एप्रिल रोजी पोलीस स्टेशनवर ‘धडक मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर प्रशासकीय यंत्रणा हलली. २७ मार्चच्या रात्री उशिरा रायपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचे पुराव्यांवरून दिसत होते. विलंबाने का होईना, पण गुन्हा दाखल झाल्याने तपासाला दिशा मिळाली आहे.