आर्वी -/ न्यायालयात अखिल भारतीय अधिवक्ता परीषदेच्या स्थापना दिनानिमित्त अखिल भारतीय अधिवक्ता परीषद विदर्भ प्रदेश जिल्हा वर्धा,तालुका आर्वी आणि तालुका वकील संघ, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यासवर्गात नवीन लागू झालेले फौजदारी कायदे विषयक माहिती, या कायद्यामधील तरतुदींबाबत, पोलिसांना मिळालेल्या अवाजवी अधिकारांबाबत होत असलेला अपप्रचार दूर करणे, आणि लागू झालेले कायदे हे लोकाभिमुख कसे आहेत याबाबत अखिल भारतीय अधिवक्ता परीषद, विदर्भ प्रदेश जिल्हा वर्धाचे अध्यक्ष तथा मुख्य सरकारी वकील गिरीशजी तकवाले हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थीत होते. गिरीशजी तकवाले यांनी या प्रसंगी नवीन कायदे आणण्यामागील उद्देश, यामधील तरतुदी ह्या जुन्या कायद्यातील तरतुदींपेक्षा कशा वेगळ्या आणि सोयीस्कर आहेत याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नवीन कायद्याचे नाव आणि जुन्या कायद्याचे नाव यामध्ये कसा फरक आहे आणि फक्त नवीन कायद्यांच्या नावांवरून ते भारतीय नागरिकांसाठी न्याय देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत तर जुने कायदे हे इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आले होते आणि त्या कायद्याच्या केंद्रस्थानी सरकार, सरकार विरुद्ध केलेले गुन्हे, सरकारी मालमत्ता आणि या गुन्ह्याबद्दल दंड अशा पद्धतीने अमलात होते परंतु नवीन कायद्यांमध्ये किरकोळ अपराधाला पाहिलेप्रमाणे सरळ तुरुंगवासाची शिक्षा न ठोठवता त्या गुन्हेगाराला सुधारण्याची संधी सामाजिक कार्य करण्याची शिक्षा देऊन देता येईल असे प्रतिपादित केले. या नवीन कायद्रयांमुळे फौजदारी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे सहज शक्य होणार आहे व त्यामुळे पिडीत व्यक्तीला जलद न्याय मिळणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपस्थीत वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना गिरीशजी तकवाले यांनी समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता अवतारसिंग गुरुनासिंगाणी हे होते तर तालुका वकील संघाचे अध्यक्ष मोहन गहलोत यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अधिवक्ता मिलिंद राउत यांनी केले तर प्रास्ताविक या कार्यक्रमाचे समन्वयक अधिवक्ता प्रसाद ज. देशमुख यांनी केले. आर्वी वकील संघाचे सचिव मंगेश करडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला अधिवक्ता वर्गाची मोठ्या संखेने उपस्थिती होती.