सिंदी (रेल्वे) -/ दिनांक 19,20,21 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमना-मारडा या गावातील नदी-नाल्या लगतच्या खरीप हंगामातील शेतीपिकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.पुराच्या पाण्यामुळे शेतीजमीन खरवडून गेली आहे. त्यामुळे सरकारने या भागातील शेतांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच येथील नदीपत्राचे खोलीकरण करण्याची मागणी कळमना-मारडा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.मागील 10 दिवसापासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असुन पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतपिकांचे खुप मोठया प्रमाणात अतोनात नुकसान झाले असुन पिके निस्तनाभुत होवुन जळली आहे. त्याच प्रमाणे सर्व सामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. दिनांक 19,20,21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कळमना व मारडा गावातील नदीला महापूर येऊन नदीलगत असलेल्या शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे या शेतात उभे असलेले खरीप हंगामातील कापूस, सोयाबिन व इतर पिके पुर्णपणे वाहून गेले व काही मातीत दबले आहे. तसेच शेतातील सुपीक जमीन खरवडून वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सदर खरीप हंगामातील पिकांची पेरणी, लावणी करून अर्धा हंगाम होऊन गेला. त्यामुळे आता परत बि-बियाणे विकत घेऊन दुबार पेरणी करण्याची वेळ निघून गेल्यामुळे या हंगामातील उत्पन्नापासून शेतकरी वंचित राहणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नेहमीच नदी व नाल्याला महापूर येऊन दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत राहते त्यामुळे यावर उपाय म्हणून या नदी व नाल्याचे खोलीकरण करून देऊन नेहमीच्या या संकटाचा निपटारा करून द्यावा, असे शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर नदी व नाल्याचे खोलीकरण करून देण्याबाबत शेतकऱ्यांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी करीत आहे. परंतू, शासनाकडून आतापर्यंत साधी मौका चौकशी सुद्धा झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मौका चौकशी करून गावाचे व शेतातील पिकांची पाहणी व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जिल्ह्याधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
यावेळी कळमना-मारडा येथील शेतकरी गजानन पाल, मनोहर खडसे, गजानन खेकडे, स्वप्नील झाडे, अंकुश पाल, बाबाराव रेवतकर, संजय भोयर, आनंद मुडे, हिरामण वाकडे, उत्तम कळमकर, अक्षय मुडे, तुषार मुके, मंगेश पाल, धर्मा पवार, सोनु तळवणकर, राहुल वाघमारे, चिंतामण निवटे, अमोल वाकडे, अजय पवार, गजानन मुडे आदी उपस्थित होते.
🔥कळमना-मारडा गावाला भविष्यात पुराचा धोका
कांढळी-सिंदी-सेलडोह या 353 (आय) या महामार्गावर मारडा येथे पुलाचे काम सुरू आहे. सदर पुलाचे व पुलाच्या भिंतीचे काम पुर्ण झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी पुलाच्या भिंतीला अडून गावात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मारडा व कळमना या दोन्ही गावांना येणाऱ्या पुरामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर बाबीची चौकशी करून त्यावर आताच उपाययोजना करून पुढील धोका टाळावा. गजानन पाल,माजी सरपंच,कळमना-मारडा