🔥पद्मश्री चितमपल्ली यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी,पोलीस अधीक्षक अनुराग जैन.🔥पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या स्मरणार्थ अस्थीपूजन,पदयात्रा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.
वर्धा -/ अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी जीवनभर पर्यावरण आणि जंगलाचे संरक्षण व संवर्धनासाठी कार्य केले. त्यांनी जंगलात वास्तव करून अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली. सामान्य जनतेला झाडे,वनस्पती आणि वन्यजीवांचे महत्त्व पटवून दिले.त्यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे विचार वर्ध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी व्यक्त केले.
पद्मश्री चितमपल्ली यांच्या अस्थीपूजन आणि पदयात्रेचा कार्यक्रम वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालयात बुधवार,२५ जून रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,उपवनसंरक्षक हरवीर सिंह,सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक सुहास बढेकर, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे तिगावकर, वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र,निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, पिपल्स फॉर अॅनिमल्सचे आशिष गोस्वामी, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री मारुती चितमपल्ली २०१७ ते २०२० या कालावधीत वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात वास्तव्यास होते. काही काळ त्यांनी निवासी लेखक म्हणूनही काम केले होते. १८ जून २०२५ रोजी सोलापूर येथे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अस्थी वर्ध्याला वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांच्या माध्यमातून आणण्यात आल्या होत्या. वर्ध्यातील नागरिकांनी त्यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चितमपल्ली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वनपरिक्षेत्र कार्यालयापासून पोस्ट ऑफिस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी पुतळा मार्गे वनपरिक्षेत्र कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर अस्थीपूजन आणि शोकसभा आयोजित करण्यात आली. या वेळी सर्व वक्त्यांनी चितमपल्ली यांच्या कार्यावर आणि वर्ध्यातील पर्यावरणप्रेमींशी त्यांच्या सान्निध्याबाबत आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक हरवीर सिंह यांनी केले. त्यानंतर चितमपल्ली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणही करण्यात आले.
या कार्यक्रमाला बोर व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक सोनल कामडी, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, अर्चना नौकरकर, पूनम ब्राह्मणे, वनरक्षक माधव माने आणि अरुण गीते, ॲड. नीलकंठ हुड, ॲड. ताम्रध्वज बोरकर, मनोहर लांडगे, नंदकुमार वानखेडे, राजदीप राठोड, राहुल तेलरांधे, उज्वला घोडे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद वाघ यांनी पर्यावरण गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा तिवसकर यांनी केले.