सेलू : –तालुक्यातील वडगांव–रेहकी या वर्दळीच्या रस्त्यावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. वडगांवपासून अगदी काही अंतरावर रेहकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाणी वाहून नेण्यासाठी टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या पायलीला अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे भगदाड पडले. कालांतराने हे भगदाड आता मोठ्या आणि जीवघेण्या खड्डयात रूपांतरित झाले असून, येथे अपघात होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे.
या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी, स्कूलबस तसेच अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र अचानक उघड्या पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसात हा खड्डा दिसत नसल्याने गंभीर अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा खड्डा अनेक दिवसांपासून तसाच असूनही संबंधित यंत्रणांनी अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना केलेली नाही. ना इशारा फलक, ना अडथळे—प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे.
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खड्डा बुजवावा, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या अपघातांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावरच राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.