🔥ग्रामपंचायत कोटंबा टीबी मुक्त घोषित, आरोग्य विभागा कडून सन्मान.
सेलु -/ तालुक्यातील कोटंबा ग्रामपंचायतीने क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल टाकत ‘टीबीमुक्त गाव’ हा मानाचा दर्जा प्राप्त केला आहे. तालुक्यात राबविण्यात आलेल्या क्षयरोग नियंत्रण अभियानांतर्गत सातत्यपूर्ण प्रयत्न, जनजागृती आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून ही कामगिरी साध्य करण्यात आली.
२४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती सेलूच्या सभागृहात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे यांच्या हस्ते कोटंबा ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सामुदायिक आरोग्य अधिकारी वैशाली तीतरे, आरोग्य सेविका जयश्री मोहदुरे, आरोग्य सेवक उमाटे, ग्रामविकास अधिकारी कंठाळे तसेच आशा कार्यकर्त्या वैशाली रघाटाटे यांनी सत्कार स्वीकारला.
या उपक्रमाच्या यशामागे गावपातळीवरील लोकप्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेची मेहनत, नियमित आरोग्य तपासण्या, संशयित रुग्णांची वेळेत तपासणी व उपचार, तसेच नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेल्या मोहिमांचा मोठा वाटा आहे. गावातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन तपासणी करणे, औषधोपचारात सातत्य राखणे आणि रुग्णांना मानसिक आधार देणे या गोष्टींवर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी चोपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वरठी, विस्तार अधिकारी चालाख यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कोटंबा ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले.‘टीबीमुक्त गाव’ ही केवळ एक पदवी नसून ग्रामस्थांच्या आरोग्यदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे. तालुक्यातील इतर गावांनाही प्रेरणा मिळणार असून, क्षयरोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ मिळणार आहे.