🔥राळेगावात ३४ नव्हे, केवळ २ मुली बेपत्ता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे स्पष्टीकरण.
यवतमाळ -/राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल ३४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा खळबळजनक दावा भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी केल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर करत हा दावा खोडून काढला आहे. “राळेगाव परिसरातून सध्या केवळ दोनच मुली बेपत्ता असून, ३४ मुलींच्या अपहरणाचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही,” असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्टपणे सांगितले.
गेल्या काही काळातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणांचा आढावा घेत पोलीस अधीक्षकांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते २०२५ मध्ये राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये एकूण ३८ मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या तातडीच्या तपासाअंती या सर्व ३८ मुली सुखरूप घरी परतल्या आहेत.
२०२६चालू वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत ४ मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यापैकी २ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, त्या आपल्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सध्या रेकॉर्डवर केवळ दोनच मुली बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस दलाची विशेष पथके अहोरात्र काम करत आहेत.भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बोलताना कुमार चिंता म्हणाले की, “विनाकारण आकड्यांचा फुगवटा करून भीती निर्माण करणे चुकीचे आहे. पोलीस रेकॉर्डनुसार केवळ दोन मुलींचा शोध घेणे बाकी आहे. यासाठी विविध तपास पथके तैनात करण्यात आली असून लवकरच या मुलींना शोधले जाईल.” जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आश्वस्त केले की, राळेगाव किंवा संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची तक्रार प्रलंबित नाही किंवा कायदा व सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. पोलीस प्रशासन आपले काम अत्यंत तत्परतेने आणि पारदर्शकपणे करत आहे. एकूणच, भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले, तरी पोलीस अधीक्षकांच्या या सडेतोड स्पष्टीकरणामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलीस यंत्रणा त्या दोन मुलींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.