आर्णीत खाकी आणि ‘कलम’बाजांची अभद्र युती शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारणाऱ्या चोरांना पोलीस संरक्षणात मोकळे रान!

🔥हेच ते लाच घेऊन शेतकरी कुटुंबाला गडविणारे ठाणेदार निलेश सुरडकर.
🔥आर्णीत खाकी आणि ‘कलम’बाजांची अभद्र युती
शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारणाऱ्या चोरांना पोलीस संरक्षणात मोकळे रान!
आर्णी -/ शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे” ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल, पण आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरवडकर आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारा वसुलीखोर मनोज यांनी या म्हणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. कापूस चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला रंगेहात पकडूनही, केवळ पैशांच्या हवसापोटी या टोळीला सोडून देण्यासाठी जे ‘सेटलमेंट’चे नाट्य रंगले, त्याने संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला आहे. १८ मार्च रोजी आर्णी तालुक्यातील अंबोडा येथे कापूस खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करणारी बार्शिटाकळी (जि. अकोला) येथील टोळी रंगेहात पकडली गेली. रमेश राठोड आणि दिलीप घोरपडे या शेतकऱ्यांचा सुमारे १ लाख २ हजार ५०० रुपयांचा कापूस या टोळीने डिजिटल काट्याला ‘रिमोट’ लावून लंपास केला होता. सादीक नावाच्या आरोपीकडे हा रिमोट सापडला आणि शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे ही टोळी पोलिसांच्या हवाली करण्यात आली.
अटकेतील आरोपीं मोहम्मद वारीस, सादीक रसुल, रेहबर खान, अन्सार खान, गफ्फार शहा, अब्दूल आतीक, अफताब अहेमद, शेख जूबेर, तारीक खान, ईम्रान खान, मोहम्मद सोयेब, नावेद खान, अ. नासीद आणि सोहेल खान.
गुन्हा दाखल झाला, आरोपी कोठडीत गेले, पण खरा खेळ इथूनच सुरू झाला. पोलीस आणि आरोपींच्या मध्ये दलाल म्हणून उभा राहिला तो म्हणजे ‘पत्रकार’ मनोज. या महाशयाने आरोपींच्या कुटुंबांकडून त्यांना सोडवण्यासाठी प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
इतकेच नाही, तर ‘साहसिक’च्या खऱ्या प्रतिनिधीने जेव्हा हा काळाबाजार पाहून पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा या वसुलीखोर मनोजने “मीच साहसिकचा प्रतिनिधी आहे” असे भासवून ठाणेदार निलेश सुरवडकर यांच्याशी संधान साधले. “सर्व पत्रकारांना मॅनेज केले आहे, तुमचा वाटा तयार आहे, आता आरोपींना सोडून द्या,” अशी ग्वाही या वसुलीबाजाने पोलिसांना दिली. एका पत्रकाराने पोलीस आणि गुन्हेगारांमधील दुवा बनून स्वतःच्याच पेशाला काळिमा फासण्याचे काम येथे केले आहे.
आर्णीचे ठाणेदार निलेश सुरवडकर हे ‘तोडी’ करण्यात किती वस्ताद आहेत, याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी प्रामाणिकपणे कारवाई करून टोळी पकडली, पण ठाणेदारांनी या वसुलीखोर पत्रकाराच्या माध्यमातून ‘लक्ष्मी’ दर्शन घेऊन आरोपींना अभय देण्याची तयारी दर्शवली.
ज्या शेतकऱ्यांनी कबाड कष्ट करून कापूस पिकवला, त्यांची फसवणूक करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्याऐवजी, पोलीस स्टेशनमध्येच त्यांच्या सुटकेचा सौदा मांडला जातो, हे लोकशाहीचे दुर्दैव नाही का?
पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अशा ‘तोडीबाज’ ठाणेदारावर कारवाई करणार की या वसुलीचा हिस्सा वरपर्यंत पोहोचत आहे?
आज समाजात पत्रकाराला ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ मानले जाते. मात्र, मनोजसारखे ‘चमेलीचा दल्ला’ खाणारे आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारे दलाल केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी पोलिसांशी सेटलमेंट करत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकरणातील वसुलीखोर मनोज आणि भ्रष्ट ठाणेदार निलेश सुरवडकर यांच्या युतीने आर्णी तालुक्यात कायद्याचे राज्य नसून ‘पैशांचे राज्य’ असल्याचे सिद्ध केले आहे.सखोल चौकशी आणि निलंबन या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने’ सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. आरोपींकडून घेतलेली लाखो रुपयांची खंडणी आणि ठाणेदाराचा त्यातील सहभाग यांची चौकशी करून निलेश सुरवडकर यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी होत आहे. तसेच, पत्रकारितेच्या नावाखाली दलाली करणाऱ्या मनोजवरही खंडणीचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.
बळीराजाच्या घामावर दरोडा टाकणाऱ्या या खाकी आणि ‘कलम’बाजांना जोपर्यंत धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत आर्णीतील शेतकरी शांत बसणार नाही!
“आम्ही चोरांना पकडून द्यायचे आणि पोलिसांनी पैसे खाऊन त्यांना सोडून द्यायचे? जर हेच चालणार असेल, तर आम्ही न्याय मागायला कुणाकडे जायचे?” असा संतप्त सवाल अंबोडा येथील शेतकरी विचारत आहेत.(क्रमशः)
ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 अर्णी
