🔥टाकळीच्या तलावात बुडून जाजू कॉलेजच्या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू🔥दुपारची मौजमजा बेतली जीवावर; दोघे थोडक्यात बचावले🔥तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने घात,पालकांचा आक्रोश
🔥बोरगावच्या दुर्घटनेची शाई वाळते न वाळते तोच नवे संकट
यवतमाळ -/ मित्रांसोबत निसर्गरम्य वातावरणात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणांच्या आनंदावर काळाने घाला घातला. यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण कसेबसे पोहून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. ही हृदयद्रावक घटना आज, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. मृत तिन्ही तरुण यवतमाळ येथील जाजू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच बोरगाव तलावात फार्मसीच्या दोन विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, या दुसऱ्या सलग दुर्घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेश सुनील यादव (वय २० वर्षे, रा. बालाजी पार्क, यवतमाळ), पियुष विनोद यादव (वय १८ वर्षे, रा. यवतमाळ) आणि प्रसाद सातपुते (वय २० वर्षे, रा. बोरगाव – अकोला बाजार) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास जाजू महाविद्यालयातील पाच विद्यार्थी दुचाकीने फिरण्यासाठी यवतमाळ लगतच्या टाकळी शिवारात गेले होते. टाकळी येथील पाझर तलावाचा परिसर पाहून विद्यार्थ्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या उकाड्यामुळे आणि मौजमजेच्या भरात पाचही मित्रांनी तलावाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला काठावर पोहणाऱ्या या तरुणांपैकी तिघे पाण्याच्या मध्यभागाकडे गेले. मात्र, तलावातील खोली आणि खाली असलेल्या गाळाचा त्यांना अजिबात अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहात आणि खोल डोहात पाय अडकल्याने तिघेही गटांगळ्या खाऊ लागले. आपल्या मित्रांना बुडताना पाहून इतर दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा थांगपत्ता लागत नसल्याने ते दोघे कसेबसे पोहून काठावर आले आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी तातडीने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मानकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार योगेश देशमुख यांनीही तत्काळ घटनास्थळ गाठून बचाव पथकाला (रेस्क्यू टीम) पाचारण केले. बचाव पथकाने बोटी आणि गळ यांच्या साहाय्याने तलावात तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तलावाच्या खोल भागातून प्रथमेश यादव, पियुष यादव आणि प्रसाद सातपुते या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच बोरगाव येथील तलावात फार्मसी शाखेत शिकणाऱ्या दोन निष्पाप विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेचे सावट आणि कुटुंबीयांचे अश्रू अद्याप वाळलेही नव्हते, तोच टाकळी तलावातील या दुर्घटनेने प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांना पुन्हा एकदा हादरवून सोडले आहे. पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला महाविद्यालयीन तरुण अशा तलाव व धरणांच्या परिसरामध्ये विनापरवाना व सुरक्षेची कोणतीही साधने नसताना पोहायला जात असल्याने अशा दुर्घटनांची मालिका सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
घटनेची वार्ता यवतमाळ शहरात आणि बोरगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तिन्ही मृत तरुण हे उच्चशिक्षण घेत होते आणि घरची परिस्थिती अत्यंत सामान्य ते मध्यमवर्गीय आहे. एकुलता एक मुलगा आणि तरुण वयातील मुलांचा असा अचानक अंत झाल्याचे समजताच शासकीय रुग्णालयाच्या आवारात नातेवाईक व मित्रपरिवाराने प्रचंड गर्दी केली होती. घटनास्थळी आणि रुग्णालयात आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता. या दुर्दैवी घटनेमुळे जाजू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्येही तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.”टाकळी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिघेही जाजू कॉलेजचे विद्यार्थी होते. बचाव पथकाच्या साहाय्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तरुणांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या खोलीचा अंदाज नसताना खोल पाण्यात जाणे टाळावे.”
— योगेश देशमुख (तहसीलदार, यवतमाळ)
”घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून यवतमाळ ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या तरुणांवर आणि पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी गस्त वाढवण्यात येईल.”— प्रवीण मानकर (ठाणेदार, ग्रामीण पोलीस ठाणे, यवतमाळ)