🔥यवतमाळ जिल्हा पीक विम्यातून वगळला? शेतकऱ्यांत संताप, लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह?
यवतमाळ,(प्रतिनिधी) — /देशात व महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युती सरकारच्या काळातही शेतकरी प्रश्न कायम तीव्र असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हाला पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याची बाब समोर येताच शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कापूस पट्ट्यातील प्रमुख जिल्हा असलेल्या यवतमाळमध्ये दरवर्षी नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत पीक विमा हा मोठा आधार मानला जातो. मात्र, याच जिल्ह्याला विमा योजनेपासून दूर ठेवण्याचा निर्णय झाल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्याने राज्याला अनेक मंत्री दिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच स्थानिक खासदार व आमदार असूनही, जिल्ह्याच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “इतके लोकप्रतिनिधी असूनही जर शेतकरीच वंचित राहत असतील, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” अशा तीव्र शब्दांत शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी तात्काळ निर्णयाचा पुनर्विचार करून यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत समावेश करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.