🔥“रेतीनंतर आता गारगोटी माफियांचा खेळ; आर्णीत रात्रीच्या अंधारात लाखोंचा काळाबाजार!”
🔥बोरगाव–दाबडी परिसर बनला तस्करांचा अड्डा; नामांकित चेहऱ्यांवर संशयाची सुई.
आर्णी -/ शहरात आतापर्यंत रेती चोरीच्या चर्चा रंगत होत्या, मात्र आता नव्या प्रकाराने डोके वर काढले आहे. शहरातील काही नामांकित आणि चारचित व्यक्ती ग्रामीण भागातून लाखो रुपयांची गारगोटी उत्खनन करून कोठ्यावधी रुपयांचा काळाबाजार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे बोरगाव–दाबडी परिसर हा या गारगोटी तस्करीचा मुख्य केंद्रबिंदू बनल्याचे समजते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तस्कर मोठ्या प्रमाणात गारगोटी उपसा करून बाहेरच्या राज्यात विक्री करत असल्याची माहिती स्थानिकांकडून पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी हेच तस्कर रेती चोरीत सक्रिय होते. मात्र गारगोटीत अधिक नफा मिळत असल्यामुळे त्यांनी आता आपला मोर्चा या नव्या “धंद्याकडे” वळवला आहे. लाखो रुपयांचा माल एका रात्रीत बाहेर जात असल्याचे बोलले जात असून, या सगळ्या प्रकारामुळे शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रश्न एकच “आर्णीत सुरू असलेल्या या गारगोटी माफियावर प्रशासनाचा लगाम कधी बसणार?”(क्रमशः)