🔥४२ लाखांचा रस्ता चार महिन्यात उध्वस्त — वानाडोंगरीत भ्रष्टाचाराचा स्फोट..!
🔥दोषींवर कारवाई न झाल्यास जनतेचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.
हिंगणा वानाडोंगरी -/ जुना प्रभाग क्र. ८ व नवीन प्रभाग क्र. ११ अंतर्गत ऋषिकेश बेलसरे ते नाला नागोबा मंदिरपर्यंत तब्बल ४२ लाख ३७ हजार ६३१ रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता अवघ्या चार महिन्यांत उखडून निघाल्याने प्रशासन व कंत्राटदारांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते संकेत सुनिल सेलूकर व संतप्त नागरिकांनी केला असून, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा अनुपस्थित असल्याने कांबळे सर यांना संतप्त निवेदन देण्यात आले.
माहितीनुसार, संबंधित कामाचे कंत्राट ‘रॉयल मल्टी सर्व्हिसेस’ या कंपनीला देण्यात आले होते व दि. ०७ जून २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र लाखो रुपयांचा हा रस्ता काही महिन्यांतच उखडून खड्ड्यांचा सापळा बनला आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे वाहून गेले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या खर्चानंतरही रस्त्याची अशी अवस्था झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट व संशयास्पद असल्याचा आरोप जोर धरत आहे.
या प्रकरणात काही प्रशासकीय अधिकारी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताची शक्यता व्यक्त होत असून, काम पूर्ण झाल्यानंतर साहित्य तपासणी, कोर कट टेस्ट व इतर गुणवत्ता चाचण्या झाल्या की नाहीत, याबाबत प्रशासन मौन बाळगून आहे. करदात्यांच्या पैशांची उघड उधळपट्टी होत असताना साधी चौकशीही न केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
“सखोल व निष्पक्ष चौकशी करून लेखी अहवाल जाहीर करावा, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा संकेत सेलूकर यांनी दिला. भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोनक किरण खराबे, सुधीर बालाजी मस्के, नंदू पोटे, निलेश भुरसे, प्रमोद मलेवार, दीपक नासरे, अनुप डाखळे, अरुण कैकाडे, नितीन बेन्दले, अजय चाकुंदे, तुषार वानखेडे, प्रतीक सूर्यवंशी, शशिकांत लांडगे, राहुल वेले यांच्यासह प्रभाग ११ मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता प्रशासन कारवाई करते की जनतेचा रोष उसळतो — याकडे संपूर्ण वानाडोंगरीचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)