पवनार येथे धाम नदीच्या पाण्याचे पूजन
![](https://sahasiknews.com/wp-content/uploads/2021/12/IMG-20211217-WA0013-1024x1024.jpg)
प्रतिनिधी / पवणार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय भुजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर कार्यालयाचे वतीने सदभावना ग्रामीण विकास संस्था व पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्था वर्धा यांच्या सहकार्याने १७ डिसेंबर रोजी पवनार येथील धाम नदीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.
जल पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर कार्यालयाचे निर्देशक डॉ. प्रभात जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून सदभावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलींद भगत, पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्था वर्धाचे माधव कोटस्थाने, बजाज फाऊंडेशनचे विनेश काकडे, पवनारच्या सरपंच शालिनी आदमने, विश्व हिंदू परिषदेचे अटल पांडे यांची उपस्थिती होती.
भागवताचार्य हेमंतशास्त्री पाचखेडे, मुकुंद देशपांडे, वैभव मिश्रा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धाम नदीच्या पाण्याचे पाणलोट आधारित पूजन करण्यात आले.
अध्यक्ष डॉ. प्रभात जैन म्हणाले की, देशातील प्रत्येक नदीला गंगेचा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येकाने आपल्या गावातील नदीला देवी मानत नदी प्रदूषित न करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाणी हेच जीवन असून पाण्याचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील पाणी संवर्धन व संरक्षण यावर समायोचित विचार व्यक्त केले. भुजल कार्यालय नागपूरचे वैज्ञानिक राहुल शेंडे यांनी पॉव्हर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भुजल व्यवस्थापनावर माहिती दिली.
देशातील नद्यांना पौराणिक प्रतिष्ठा मिळवुन देण्यासोबतच पुर्नस्थापना करणे. नदयांचे शोषण थांबविणे. प्रदूषणापासून मुक्त करणे. जीवनदायी नद्यांना सुरक्षित ठेवण्याचे उद्देशाने भारत सरकारच्या वतीने १७ ते २३ डिसेंबर दरम्यान नदी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्तविक सदभावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलींद भगत यांनी केेले. त्यांनी जेएनपीटी व सीएसआरच्या सहकार्याने धाम नदीचे परिसरात राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचे माहिती दिली. आभार दिगांबर उमक यांनी मानले. आयोजनाकरिता लोकेश रंगारी, अश्विन आटे, बिसेन कामडे, लिलाधर नवघरे, सत्यजीत जांभुळकर, गिरीष पडोळे, सचिन तांदुळकर, सुबोध लाभे, आकाश बावणे,मनीष नरडवार, किशोर कोहाडे, अजय सोरदे, संजय भगत यांनी प्रयत्न केले.