वर्ध्यात कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबास 50 हजाराचे सहाय्य

0

 

प्रतिनिधी/ वर्धा :

कोविड संसर्गामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय देण्यात येणार आहे. कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांनी मदतसाठी कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. मदत वाटपासाठी शासनाने ऑनलाईन वेबपोर्टल विकसित केले आहे. अर्जदारास mahacovid19relief.in  पोर्टलवर लॉगिन करुन ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज अर्जदारास स्वत: किंवा सेतु केद्र तसेच गावातील नागरी सुविधा केंद्राद्वारे सादर करता येईल. अर्ज सादर करतांना अर्जदारास त्यांचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील त्यात मृत्यु प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांचा समावेश आहे. या कागदपत्रांच्या आधारे त्यांचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी  लॉगिन करता येणार आहे.
केंद्र शासनाकडे ज्यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची नोंद  झालेली  आहे, अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही  कागदपत्राची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी कोविड मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील कागदपत्राची मागणी न करता मंजूर  करण्यात येणार आहे. अर्जदाराचे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविडमुळे मृत्यु झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.
एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तरावरील तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीकडे अपिल करता येणार आहे. यावर सदर समितीस  प्रकरणाची सुनावणी  घेऊन अंतिम निर्णय देण्याचा अधिकार असणार आहे. अंतिमत: प्रकरण मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्नीत बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!