🔥हाच तो विषारी दारूचा पुरवठा करणार शुभम जयस्वाल🔥हेच ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त पराग नवलकर शुभम जयस्वाल व मनीष जयस्वाल कडून लाखो रुपयाची लाच घेऊन स्वतःचे कर्तव्य विसरले🔥विषारी दारूने तिघांचे जीव घेतले तरी उत्पादन शुल्क ‘सुस्त’! तस्कर शुभम जयस्वालच्या पैशांपुढे अधिकारी लाचार🔥मारेगाव ते अकोलाबाजार बनावट दारूचे साम्राज्य!🔥खाकी अन् ‘एक्साईज’ जयस्वाल टोळीच्या दावणीला? तीन निष्पापांच्या चिता शांत झाल्या, पण हप्तेखोरीत बुडालेल्या यंत्रणेला अजूनही पाझर फुटेना!
प्रतिनिधी – यवतमाळ -/ मारेगाव तालुक्यात बनावट आणि विषारी देशी दारूने तिघांचा नाहक बळी घेऊन महिना उलटला, तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यात अंजन पडलेले नाही. अकोलाबाजारचा कुख्यात दारू तस्कर शुभम जयस्वाल याच्या आर्थिक बोजाखाली दबलेले उत्पादन शुल्क अधिकारी नागलवाड आणि वणी विभागाचे निरीक्षक यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे हा संपूर्ण परिसर सध्या बनावट दारूचा ‘मृत्यूचा अड्डा’ बनला आहे. तिघांचे बळी गेल्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना याचे कसलेही सोयरसुतूक नसून, वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेले आर्थिक ‘अर्थकारण’ निष्पापांच्या जीवावर उठल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. महिनाभरापूर्वी मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील देशी दारूच्या दुकानातून विक्री झालेल्या विषारी दारूमुळे तिघांचा तडफडून मृत्यू झाला होता. तपासाअंती आणि स्थानिक माहितीनुसार, या दुकानाला बनावट दारू पुरवण्याचे मुख्य काम अकोलाबाजारचा तस्कर शुभम जयस्वाल यानेच केले असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, इतकी गंभीर घटना घडूनही वणी येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांनी जयस्वाल टोळीवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी संशयास्पद मौन बाळगल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बनावट दारूच्या काळ्या पैशांवर अल्पावधीत नवश्रीमंत झालेल्या शुभम जयस्वालचा परिसरात प्रचंड राजकीय आणि प्रशासकीय दबदबा निर्माण झाला आहे. अकोलाबाजार येथे त्याचे सी.एल.-२ परवानाधारक दुकान आणि स्वतःचे एक चिल्लर देशी दारूचे दुकान आहे. तसेच त्याचा भागीदार मनीष जयस्वाल याच्या देशी दारूच्या चिल्लर दुकानातून राजरोसपणे बनावट दारूची निर्मिती आणि घाऊक विक्री सुरू आहे.
या टोळीचे जाळे केवळ अकोलाबाजारपुरते मर्यादित नसून, वडगाव (जंगल) येथे राहणारा शुभमचा नातेवाईक संदीप जयस्वाल हा या संपूर्ण बनावट दारू कारखान्याचा मास्टरमाइंड मानला जातो. संदीप जयस्वाल सध्या वडगाव (जं) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डझनभर गावांमध्ये विषारी बनावट दारूचा पुरवठा करत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, पारवा, घाटंजी, वडकी, कळंब, राळेगाव या मार्गाने थेट वर्धा जिल्ह्यापर्यंत दररोज लाखो रुपयांची अवैध व बनावट दारू पोहोचवली जात आहे. तस्करांचे हे सिंडिकेट इतक्या निर्धास्तपणे कसे चालते, याचे उत्तर या संपूर्ण मार्गावरील हप्तेखोरीत दडले आहे. दारू पुरवठ्याच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्याला आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे ‘मोबदला’ (हप्ता) पोहोचवण्याचे काम कळंब येथील वाइन शॉपचा मालक मनीष जयस्वाल याच्याकडे असल्याची उघड चर्चा आहे. खाकी आणि एक्साईजचे अधिकारी जयस्वाल टोळीच्या पैशांवर गब्बर होत असल्याने कोणतीही गाडी अडवली जात नाही आणि कोणतीही तपासणी केली जात नाही. या संपूर्ण बनावट दारूच्या काळ्या धंद्याबाबत आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमरावती विभाग आयुक्त पराग नवलकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी करण्यात आल्या. मात्र, इतके दिवस उलटूनही आयुक्त कार्यालयाकडून साधी प्राथमिक चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे खुद्द अमरावती आयुक्त कार्यालयातच ‘पाणी मुरतेय’ का आणि तस्करांच्या पैशांचे धागेदोरे थेट वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचले आहेत का, असा गंभीर संशय आता निर्माण झाला आहे.
तीन गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या बनावट दारू माफियांची पाळेमुळे खणून काढणार की अजून काही बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार, असा जळजळीत सवाल आता मारेगाव आणि यवतमाळची जनता विचारत आहे.(क्रमशः)