वर्धा -/ रोठा येथील अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात शनिवारी संपूर्ण वर्धा शहरात संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य जनआक्रोश मोर्चात मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो नागरिक, महिला आणि युवक सहभागी झाले. दुसरीकडे, या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘वर्धा बंद’ला व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील बहुतांश बाजारपेठ दिवसभर बंद राहिली.शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. “पीडितेला न्याय द्या”, “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बजाज चौक व सामान्य रुग्णालय मार्गे हा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. तेथे प्रतिनिधी मंडळाने पोलीस प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.मोर्चात नगराध्यक्ष सुधीर पांगुळे, डॉ. अभ्युदय मेघे, देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे, चंद्रशेखर मडावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संयोजक तुषार उमाळे, शरद आडे, विठ्ठल उईके, शिवराज शिंदे, सतीश आत्राम, ज्ञानेश्वर मडावी, राजेंद्र मसराम, नरेंद्र मसराम, अजित इरपाते, विजय जुगनाके, विजय कंगाले, मंगेश सराटे, दुष्यंत ठाकरे, संजय इरपाते, प्रदीप पवार, प्रकाश पेंदाम, राजू आडे, कैलास मरसकोल्हे, आशिष पेंदाम, पीयूष कोल्हे, नरेंद्र तोडासे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.प्रदर्शनकर्त्यांनी इशारा दिला की, या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
🔥‘वर्धा बंद’ला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा.
रोठा हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘वर्धा बंद’ला शहरातील व्यापाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. मुख्य बाजारपेठेसह विविध भागातील दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर स्वेच्छेने बंद ठेवण्यात आली. व्यापाऱ्यांनी पीडितेला न्याय मिळावा, अशी भूमिका घेत घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
🔥प्रमुख मागण्या
🔥मुख्य आरोपीसह इतर आरोपी असल्यास निष्पक्ष चौकशी करून तत्काळ अटक करावी.
🔥नसरापूर अत्याचार-हत्याकांडाच्या धर्तीवर दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लावावा.
🔥फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी घेऊन आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी.
🔥पीडित पक्षासाठी वरिष्ठ सरकारी वकिलांची नियुक्ती करावी.
🔥पोलिसांनी वेळेत तपास पूर्ण करून लवकर आरोपपत्र दाखल करावे.
🔥पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून आवश्यक आर्थिक व शासकीय मदत द्यावी.
पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिल्यानंतर परतणाऱ्या काही आंदोलनकर्त्यांनी मुख्य बाजारपेठेत प्रवेश केला. काही दुकाने उघडी असल्याचे दिसताच घोषणाबाजी करत तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे बाजारपेठेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
मोर्चादरम्यान शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.