🔥सीईटी परीक्षेदरम्यान आष्टीतील मोंटफोर्ट फार्मसी महाविद्यालयात गोंधळ.🔥विद्यार्थी व पालकांचा संताप; प्रशासनाच्या हस्तक्षेपाने परीक्षा अखेर पार पडली
आष्टी शहीद,ता. प्रतिनिधी (नरेश भार्गव)
इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेदरम्यान आष्टी येथील मॉन्टफोर्ट फार्मसी विद्यालय येथे मोठा गोंधळ उडाला. परीक्षा केंद्रावर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पोलिस, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या तत्पर हस्तक्षेपामुळे अखेर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे 2026 रोजी जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, देवळी, आर्वी आणि सेलू परिसरातील शेकडो विद्यार्थी सकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. परीक्षेची वेळ सकाळी 9 वाजताची होती.
मात्र, महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून देय रक्कम न मिळाल्याचे कारण देत परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार उघडले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतप्त विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच काही पालकांनी आपत्कालीन सेवा 112, तांत्रिक शिक्षण विभाग, महसूल प्रशासन तसेच खासदार अमर काळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ठाणेदार राजेश जोशी, नायब तहसीलदार ओम प्रकाश बाड स्कर, तलाठी हासिफ शेखआणि खासदारांचे प्रतिनिधी जितू शेठे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्रशासनाने महाविद्यालय व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट करून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. झालेल्या विलंबामुळे परीक्षेची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आणि विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता परीक्षा देता आली.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ करण्यात आल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. संबंधित संस्थेविरोधात यापूर्वीही विविध तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असून, या केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी काही विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
एका पालकांनी सांगितले, “मी वर्धाहून पहाटे साडेपाच वाजता मुलीला घेऊन आष्टीला आलो. येथे आल्यानंतर प्रवेश नाकारण्यात आल्याने आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.” शासनाने अशा नियमबाह्य त्रास देणाऱ्या विद्यालयाला काड्या यादीत टाकून सेंटर रद्द केले पाहिजे
व शासनाने शेकडो किलोमीटर परीक्षा सेंटर दिल्यामुळे पालकांना आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याचे सांगितले वाल्मीक भोयर राहणार केळापूर जिल्हा वर्धा.