🔥आजपासून बोरतीरावर वैष्णवांची मांदियाळी.! प्रती पंढरीत दहा दिवस हरिनामाचा गजर.
संत केजाजी महाराज यांचा ११९ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक ११ रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायनाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता गावातील दिंडी मार्गाने ग्रंथ मिरवणूक निघणार आहे. या ग्रंथ मिरवणुकीत गावातील भजनी मंडळ व भाविकांचा सहभाग राहणार आहे. ग्रंथ मिरवणूक झाल्यानंतर श्रीराम कथा ज्ञान यज्ञाला सुरुवात होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायनाचे व्यासपीठ आळंदी येथील गाथामुर्ती प्रमोद महाराज ठाकरे असून श्रीराम कथा प्रवक्ते आळंदी येथील रामायणाचार्य विश्वंभर महाराज माळोदे आपल्या ओजस्वी वाणीतून रामकथा सांगणार आहेत. श्रीराम कथा दोन सत्रात चालणार असून दुपारी १ ते ४ व रात्री ७.३० ते १० या वेळात राहणार आहे. दररोज काकडा आरती सकाळी ५.३० वाजता , महाआरती सकाळी ६ वाजता , हरिपाठ सायंकाळी ६ वाजता असणार आहे. संपूर्ण घोराड नगरी विद्युत रोषणाई आणि तोरण पताकांनी सजली आहे. गावातील प्रत्येकजण पुण्यतिथी महोत्सवात वाट्याला येईल ते काम करीत असून गावात दिवाळीचा सण असल्याचे दिसून येत आहे. या महोत्सवाला आळंदी, विदर्भातील भंडारा , गोंदिया येथील संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. विदर्भा बाहेर गुजरात राज्यात संत केजाजी महाराजाप्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक असून तेथेही मंदिर आहे. येथील भाविक मोठ्या संख्येने या पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावणार आहे. भाविकांच्या निवासाची व्यवस्था भक्त निवासात केली आहे. यासाठी विठ्ठल रखुमाई ट्रस्ट व संत केजाजी सेवा मंडळ व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर विद्युत रोषणाई ने सजले असून गावातील रस्ते तोरण पताकांनी नटले आहे. घोराड नगरीत हा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे प्रती दिवाळी सण आहे. या महोत्सवात घरोघरी पाहुणे मंडळी राहणार आहे. ५० हजाराहून अधिक भाविक हजेरी लावणार आहे.
ग्राम स्वच्छता अभियान.! संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दहा दिवस ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आज पासून होणार असून पहाटे ४.३० वाजता अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात गावातील बाल गोपाल, युवक व वयोवृध्द नागरिकांचा सहभागी असणार आहेत. हे अभियान येत्या दहा दिवस चालणार असून या अभियानात ग्रामपंचायत प्रशासनाने देखील हिरीरीने सहभागी व्हावे, अशी मागणी आहे. या अभियानाची परंपरा आजही कायम असून या अभियानात सतीश तेलरांधे, मंगेश हांडे, बारसू निमजे, ज्ञानेश्वर माहूरे, नागो पोहाणे, उदय लाल, सुधाकर खराबे, बालगोपाल, वयोवृध्द नागरिक, युवकांचा समावेश असलेले हे अभियान गावाची स्वच्छता राखण्यात आदींचा पुढाकार राहणार आहे.