🔥जवळ्यात आमदार राजु तोडसाम यांच्या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांचा बहिष्कार.
🔥निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप, 5 बूथ अध्यक्षांसह तालुका पदाधिकारी गैरहजर.
आर्णी -/जवळा येथे आयोजित आमदार राजू तोडसाम यांच्या बैठकीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दांडी मारली. निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे.आमदारांच्या बैठकीला जवळा येथील तब्बल 5 बूथ अध्यक्ष, काही तालुका उपाध्यक्ष आणि संयोजक उपस्थित राहिले नाहीत. पक्षाच्या तळागाळातील महत्वाचे पदाधिकारीच बैठकीपासून दूर राहिल्याने भाजपच्या अंतर्गत नाराजीचे चित्र स्पष्ट झाले.”पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, फक्त ठराविक मंडळींनाच महत्व दिले जाते. आमच्या मेहनतीला किंमत नाही,” अशी थेट तक्रार नाराज कार्यकर्त्यांनी केली आहे.
पक्ष वाढीसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून केवळ विशिष्ट लोकांनाच जवळ केले जात असल्याने ही तीव्र नाराजी आता बहिष्कारापर्यंत पोहोचली आहे.
या प्रकारामुळे आर्णी तालुक्यातील भाजपच्या गटबाजीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. या बैठकीबाबत आमदार राजू तोडसाम यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही तर बुथ अध्यक्ष पिंटू चावरे, गणेश धनोडे, रुपेश आडे, बाबाराव खोडनकर, धीरज काळे, विजय सोळंके यांच्यासह काही तालुका उपाध्यक्ष व मंडळ संयोजकही यांनी बैठकीवर बहिष्कार केला.
🔥वारंवार तक्रार देऊनही कार्यकर्त्यांचे समाधान नाही.
“आम्ही पक्षासाठी रात्रंदिवस काम करतो. पण गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार राजू तोडसाम हे आमच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलत आहेत.
याबत आम्ही वरिष्ठ नेत्यांकडे वारंवार तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. तरीही आमदारांच्या वागण्यात कोणताही बदल झालेला नाही. उलट ठराविक लोकांनाच ते जवळ करून आम्हाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहेत.
पक्ष वाढवायचा असेल तर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालावे लागते. फक्त ठराविक मंडळींवर भर दिला तर तळागाळातील कार्यकर्ता तुटतो. आमची ही नाराजी आता बहिष्कारापर्यंत पोहोचली आहे.”
🔥रुपेश आडे बूथ अध्यक्ष जवळा तथा तालुका उपाध्यक्ष आर्णी तालुका पिंटू चावरे तालुका सचिव.
🔥राजू तोडसाम यांच्या कामपद्धतीवर कार्यकर्त्यांचा आरोप.
भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “आमदारांनी भाजप पक्ष संघटना वाढविण्यावर भर देण्याऐवजी, स्वतःचा मित्रपरिवार आणि बी टीम वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.” यामुळे जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांऐवजी ठराविक मंडळींनाच संधी व महत्व दिले जात असल्याने तळागाळात नाराजीचा सूर उमटला आहे. याच नाराजीमुळे जवळा येथे बैठकीवर बहिष्कार केला आहे.