🔥लाचखोर खनिकर्म अधिकारी संजय जोशीच्या भ्रष्टाचाराचे प्रमुख मुद्दे.आता होणार उघडकीस.
🔥महिन्याकाठी ४० लाखांची लाच: मोहदा खाणपट्टा, अडेगाव येथील सूर्या डोलामाईन्स आणि इशांत डोलामाईन्स यांच्याकडून दरमहा ४० लाख रुपये नागपुरात पोहोचवले जातात.
🔥प्रदूषण विभागाला २० लाखांची लाच: सूर्या आणि इशांत डोलामाईन्सच्या उत्खननाची ईटीएस (ETS) मोजणी रोखण्यासाठी चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाला २० लाख रुपये दिल्याचा आरोप.
🔥रॉयल्टी चोरीला मूकसंमती: खासगी इस्पात कोळसा खाणीतून होणाऱ्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई न करण्याचे आदेश स्वतः जोशी यांनी दिले असून, रॉयल्टी बुक न वापरता हा कोळसा सायडिंगवर टाकला जातो. सिमेंट कंपन्यांशी संगनमत: मुकूटबन येथील आरसीसीपीएल एम.पी. बिर्ला सिमेंटेशनसोबत बेकायदेशीर उत्खननासाठी लाखो रुपयांची ‘टक्केवारी’ (कमिशन) निश्चित केल्याचा आरोप.
🔥कार्यालयात फक्त दलालांना प्रवेश: सामान्य नागरिकांना डावलून केवळ लाच देणाऱ्या लोकांसाठीच कार्यालयाची दारे उघडी ठेवली जातात.
🔥वरिष्ठांच्या नावाचा गैरवापर: जिल्हाधिकारी आणि सत्ताधारी नेते आपल्या ‘मर्जीतील’ असल्याचा आव आणून चौकशीला न घाबरता उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे.
🔥यवतमाळच्या खनिज संपत्तीवर भ्रष्टाचाराचे सावट लाचखोर खनिकर्म अधिकारी संजय जोशींच्या ‘वसुली’चे जाळे. यवतमाळ -/जिल्ह्याला निसर्गाने दिलेली खनिज संपत्ती सध्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय जोशी यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात खनिजांची अवैध लूट सुरू असून, दरमहा लाखो रुपयांची लाच नागपुरात पोहोचवली जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गौण खनिज तस्करांनी आता यवतमाळच्या मोहदा आणि अडेगाव परिसरातील जमिनी पोखरल्या असून, याला खनिकर्म विभागाचा पूर्णतः आशिर्वाद लाभला असल्याचे दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, अडेगाव परिसरातील सूर्या डोलामाईन्स आणि इशांत डोलामाईन्स यांच्या उत्खननात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. या कंपन्यांच्या उत्खननाची अचूक मोजणी (ETS Survey) होऊ नये, यासाठी संजय जोशी यांनी फिल्डिंग लावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही मोजणी रोखण्यासाठी चंद्रपूर येथील प्रदूषण नियंत्रण विभागाच्या काही अधिकाऱ्यांना २० लाख रुपयांची लाच देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बदल्यात खनिकर्म अधिकाऱ्यांना महिन्याकाठी ४० लाख रुपयांचे हप्ते नागपुरात दिले जात आहेत.
केवळ डोलामाईन्सच नाही, तर खासगी इस्पात कोळसा खाणीतून दररोज शेकडो टन बेकायदेशीर कोळसा काढला जात आहे. नियमानुसार रॉयल्टी बुक भरणे अनिवार्य असताना, कोणतीही रॉयल्टी न भरता हा कोळसा सायडिंगवर पोहोचवला जातो. या अवैध व्यवहारावर कारवाई करण्याऐवजी, संजय जोशी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
मुकूटबन येथील आरसीसीपीएल एम.पी. बिर्ला सिमेंटेशन या कंपनीशी देखील जोशी यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. कंपनीला नियमाबाहेर जाऊन उत्खनन करू देण्यासाठी लाखो रुपयांची ‘टक्केवारी’ ठरवण्यात आली आहे. सरकारी तिजोरीचा महसूल बुडवून स्वतःची घरे भरण्याचे काम या विभागात सुरू आहे. खनिकर्म कार्यालयात आज सामान्य माणसाला प्रवेश मिळणे कठीण झाले असून, केवळ लाच देणाऱ्या दलालांचाच या कार्यालयात वावर वाढला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, संजय जोशी हे स्वतःला जिल्हाधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांच्या जवळचे असल्याचे भासवतात. “जिल्हाधिकारी माझ्या मर्जीत आहेत,” असा अविर्भाव ते कार्यालयात दाखवत असल्याने कर्मचाऱ्यांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यांना या भ्रष्ट अधिकाऱ्याने हरताळ फासला आहे.
यवतमाळची ही खनिज लूट थांबवण्यासाठी आता सीबीआय किंवा ईडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री या प्रकरणाची दखल घेणार नसतील, तर जिल्ह्याची कोट्यवधी रुपयांची महसूल चोरी अशीच सुरू राहील. आता चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात असून, ते या लाचखोर अधिकाऱ्याची पाठराखण करतात की त्याला घरचा रस्ता दाखवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.